राजकिय

शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवतो

अभिजीत पाटील यांचे उंबरे येथील प्रचार सभेत मतदारांना आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी)

घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे, ‘विठ्ठल’चा चेअरमन झालो. या काळात ज्या-ज्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, त्या सर्व प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. इथून पुढच्या काळातही तुमच्यापुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या, मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवतो, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी दिले.

बुधवारी अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघास जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी, करोळे, जळोली, सांगवी, बादलकोट, नेमतवाडी, पेहे, नांदोरे, आव्हे, तरटगाव, या गावांचा प्रचारदौरा करून, सायंकाळी उंबरे व रोपळे येथे जाहीर सभा घेतल्या. उंबरे येथील जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, ज्येष्ठ नेते नामदेव बापू मुळे, विठ्ठल दादा दगडे ज्ञानेश्वरजी सलगर संभाजीराव कदम सुरेशन इंगळे , शरद इंगळे, दादा इंगळे, सत्यवान मुळे, पांडूरंग शिंगटे, शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, संभाजी ब्रिगेडचे किरण कचरे, नामदेव मुळे, विठ्ठल दगडे, किसन मुळे, विष्णू बागल, जीवराज चव्हाण, नागनाथ कानगुडे, शहाजी मुळे, सत्यवान मुळे, दत्तात्रय नरसाळे, किरण कचरे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनक भोसले, संजय विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिजित आबांनी सांगितले की, एके काळी औदुंबर आण्णांनी उसाचा दर जाहीर केल्याशिवाय, राज्यातील एकही कारखानदार दर जाहीर करत नव्हता. त्यांचाच एक छोटासा कार्यकर्ता म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतल्यानंतर, धाडसाने राज्यातील उसाच्या दराची कोंडी फोडली, आणि तमाम शेतकऱ्यांना टनामागे साडेतीनशे ते चारशे रुपये जादा मिळवून दिलl . परिणामी मागील तीन वर्षात शेतकरी संघटनांना एकही आंदोलन करावे लागले नाही. इथून पुढच्या काळात फूड प्रोडक्ट, प्रकल्प उभारून उत्पादित मालाच्या निर्यातीतून शेतीकऱ्यांना परदेशी चलन मिळवून देऊ. सर्वात महत्वाचे म्हणजे सोलापूरसाठी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने, पुढील काळात उजनीतून नदीला नियमित पाणी सोडले जाणार नाही. ही बाब लक्ष्यात घेऊन नदीवर ठिकठिकाणी दहा मीटर उंचीचे बंधारे बांधून, पावसाळ्यात वाहून जाणारे २७ टीएमसी पाणी अडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. याशिवाय राज्य आणि केंद्रशासनाच्या ९३६ योजना तळागाळापर्यंत पोचवणे, बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या व्यवसायांना चालना देणे, मतदारसंघात सर्वच महापुरुषांचे पुतळे उभारणे, एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांना रोजगार देणे, दोनच वर्षात सर्व रस्ते पक्के करणे, अशी अनेक विकासकामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले,

यावेळी अभिजित आबा पाटील यांनी राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचे जनतेला अजिबात आवडले नसल्याने, लोकसभेला महाविकास आघाडीचे बत्तीस खासदार निवडून दिल्याचे सांगून, या विजयी खासदारांच्या कार्यक्षेत्रातील १९२ आमदार आघाडीचेच निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे माढा मतदार संघाचा आवाज विधानसभेत घुमला पाहिजे, यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.

माढा मतदारसंघात ज्यांनी तीस वर्षे सत्ता भोगली आणि मागील पंधरा वर्षात पंढरपूर तालुक्यातील ४२ गावातील नेते व जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्या शिंदे परिवाराने आपल्या तालुक्यातील एकाही नेत्याचा कधी माढ्यात सत्कार करतानाचा फोटो आपल्याला पाहायला मिळाला नसल्याचे सांगून, त्यानी फक्त मते घेतली पण मान दिला नाही, असे अभिजित पाटील म्हणाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close