राजकियसामाजिक

दुसऱ्या टप्प्याचेही टेंडर निघाले ! मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्णत्वास जाणार

आ. समाधान अवताडे यांचे बळ आणखी वाढले

पंढरपूर (प्रतिनिधी)

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आ. समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून १३ मार्च २४ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळवली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील १११ कोटीचे टेंडर निघून ७ ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ करण्यात आला आहे. यावरही निवडणुकीच्या तोंडावर ही स्टंटबाजी सुरू असल्याचे काही विरोधकांकडून म्हटले जात असताना, आ समाधान आवताडे यांनी दोन दिवस मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठाण मांडून दुसऱ्या टप्प्याचे टेंडरही काढले आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे ७८ कोटी ४३ लाखाचे टेंडर काल दि १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले असून, निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेवर बोलणाऱ्या विरोधकांची बोलती बंद होत चालली आहे.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मार्च महिन्यात मंजुरी दिल्यानंतर अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे, हे केवळ राजकारणासाठी लोकसभेच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा टीका विरोधकांनी केल्या. मात्र मंजुरीनंतर दुसऱ्याच दिवशी टेंडर पब्लिश झाल्यामुळे विरोधकांना चपराक बसली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या टेंडर नंतर आ. समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या योजनेच्या शुभारंभासाठी मंगळवेढ्यात बोलवत, धुमधडाक्यात या योजनेचा शुभारंभ करून कामास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होते न होते तोच दुसऱ्या टप्प्यातील कामाचेही टेंडर निघाले असून, ही योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा चंग आ. समाधान आवताडे यांनी बांधला असल्याचे यावरून दिसून येत आहे.

६९७.५१ कोटीच्या  मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या या कामांमध्ये दुसऱ्या टप्प्यात पंपगृह टप्पा दोन, संरक्षक भिंत, बॅलन्सिंग टॅंक, उर्ध्वगामी नलिका दोन लेंडवे चिंचाळे, मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम, तसेच योजना कार्यान्वितीकरण करणे, पाच वर्षे परिचलन, देखभाल व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह सर्व वितरण व्यवस्थेचे पाणी वापर संस्था स्थापन करून, सर्व वितरण व्यवस्था हस्तांतरण करणे, या बाबी दुसऱ्या टप्प्यातील टेंडरमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. दि. १४ ऑक्टोबर २०२४ ते २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये, शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निविदा मागवण्यात आल्या आहेत, तर दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. या निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता उजनी कालवा विभाग क्रमांक ९ मंगळवेढा, यांनी राखून ठेवलेला आहे. मंगळवेढा तालुक्यातील जनतेला ही योजना वर्षानुवर्षे राजकारणाचा मुद्दा ठरल्याने मृगजळ वाटत होती, मात्र आ. समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करत या योजनेचे काम सुरू केल्याने, येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात मंगळा उपसा सिंचन योजनेचे पाणी येईल अशी आशा वाटू लागली आहे.

२००९ च्या लोकसभेवर बहिष्कार टाकून दुष्काळी ३५ गावचा पाणीप्रश्न आम्ही चव्हाट्यावर आणला, त्यानंतर सातत्याने आंदोलने करून सतत त्या-त्या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले.  आ समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांने पहिल्या टप्प्यातील कार्यारंभ व दुसऱ्या टप्प्याची निघालेली निविदा हे या दुष्काळी भागासाठी फार मोठा दिलासा देणाऱ्या घटना आहेत. या योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व क्षेत्राला शंभर टक्के ठिबक सिंचन, प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंप व शेततळे शासनाने विशेष योजना राबवून देण्यासंदर्भात पायलट प्रोजेक्ट राबविण्याची मागणी आम्ही करणार आहे.

अंकुश पडवळे,

कृषीभूषण शेतकरी खुपसंगी

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close