रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे – पो. नि. विश्वजीत घोडके
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरीत पोलीस रिक्षा चालक मालक बैठक

पंढरपूर (प्रतिनिधी)
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी, मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरात येतात. या कालावधीत भाविकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीबाबत योग्य नियोजन केले आहे. रिक्षा चालकांनी शहरात भाविकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये, तसेच अपघात मुक्त वारीसाठी वाहतुक नियमांचे पालन करावे, अशा सूचना पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके यांनी दिल्या.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस संकुल येथे सुरक्षित वाहतुक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, प्रांताधिकारी सचिन इथापे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालक मालक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोटार वाहन निरिक्षक तांदळे तसेच शहरातील रिक्षाचालक मालक उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरिक्षक घोडके म्हणाले, रिक्षाचालकांनी सेवा देताना गणवेश परिधान करणे गरजेचे आहे. प्रदक्षिणामार्ग येथे कोणी रिक्षा घेऊन जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवू नये. नियमापेक्षा जास्त भाडे आकारु नये. बॅच-बिल्ला लावावा, तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास संबधितावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.