चिंता नाही , नाही घाई ! उमेदवारीसाठी आटापिटा नाही
तीन हजार कोटींच्या कामांमुळे कोणाशीच इर्षा नाही

पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात हवा कोणाचीही असो, उमेदवारीसाठी कितीही रस्सीखेच असो, या आमदाराची काहीच तक्रार नाही. अगदी शांत, संयमी आणि सरळपणे निवडणुकीला सामोरे जायचे त्यांनी ठरवले आहे. पंढरपूरचे आ. समाधान आवताडे हे विधानसभा निवडणुकीच्या काळातही आपले काम निष्ठेने करत आहेत. तीन वर्षाच्या काळात त्यांनी खेचून आणलेला ३ हजार कोटी रुपयांचा निधी त्यांना पुढील काळातही साथ देणार काय ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
आ. समाधान आवताडे हे सन २०२१ साली झालेल्या पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आमदार झाले. फारच कमी अवधी वाट्याला आल्यामुळे, त्यांनी त्यांच्या कामाला वेग दिला. या तीन वर्षाच्या काळात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून तीन हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला. यामुळे मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लागली. याशिवाय या मतदारसंघात रखडलेला मंगळवेढ्यातील काही गावांचा पाणी प्रश्न तसेच पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला. ते भाजपचे आमदार असल्यामुळे , त्यांना भरभरून निधी मिळाला. गावागावास जोडणारे रस्ते आणि वाडी वस्तीवरील रस्ते तयार झाले. यामुळे सहाजिकच त्यांच्याबाबत लोकांमध्ये सहानुभूतीची लाट पसरली. यामुळेच गावागावात त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढली. याच कामाच्या जोरावर त्यांना उमेदवारीची चिंता नाही. भाजपच्या पहिल्या रँकमधील आमदार असा त्यांचा नावलौकिक झाला.भाजपाकडून उमेदवारी फिक्स असल्याची खात्री त्यांना केव्हाच मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यास दुजोरा दिला. यामुळेच सध्याच्या उमेदवारीच्या चढाओढीत ते शांत असल्याचे दिसत आहे.
मतदारसंघात कितीही कामे केली तरी, त्याचा
गवगवा करण्यात ते कमी पडले. सध्याच्या काळात
प्रसिद्धीला फार मोठी किंमत आहे. एखादे काम कमी ,पण प्रसिद्धी करण्यात अनेक लोकप्रिय नेते कधीही कमी पडत नाहीत. परंतु आ. अवताडे यांच्या ते ध्यानातच आले नाही. बरे हे काहीही असो, पंढरपूर मतदारसंघातून भाजपचे ते सध्याचे उमेदवार आहेत. यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. त्यांचे सध्याचे वातावरण पाहता एक यशस्वी आमदार असल्यागत त्यांचे वागणे आहे. पंढरपूर मतदारसंघातील नागरिक त्यांना पुन्हा स्वीकारणार की, या मतदारसंघात पुन्हा बदल घडवणार ,हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे.