
पंढरपूर (प्रतिनिधी)
तिऱ्हे येथील जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीवर गोविंद नागनाथ सुरवसे यांची निवड झाली. या निमित्ताने तिऱ्हे गावचे सरपंच गोवर्धन जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्ष गोविंद सुरवसे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी गोविंद सुरवसे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर समस्त ग्रामस्थ आणि पालक वर्गाने आनंद व्यक्त करत, सुरवसे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना गोविंद सुरवसे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाचा दर्जा आता सुधारत आहे. शिक्षणाचे बाजरीकरण झालेले असताना, गोरगरिबांच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी जिल्हा परिषद शाळा ही एक आशेचा किरण आहे. शाळेत केवळ मोफत शिक्षण नाही तर स्पर्धेच्या युगात मुलांना टिकण्यासाठी अधिक कसदार शिक्षण कशा पद्धतीने देता येईल, यावर भर दिला जाईल, यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, १४ जूनपासून शाळा सुरु होत आहे. येत्या काळात गावातील शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच आपल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकही खाजगी संस्थेच्या तोडीचे शिक्षण देतील, हा मला विश्वास असून पालकांनी देखील आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत घालावे. त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपले शिक्षक वृंद जीवाचे रान करतील, असा विश्वास देखील यावेळी अध्यक्ष सुरवसे यांनी व्यक्त केला.
या सत्कार समारंभ प्रसंगी तिऱ्हे गावचे सरपंच गोवर्धन जगताप, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस निरीक्षक आनंद थिटे , भास्कर सुरवसे, नेताजी सुरवसे, बागायतदार योगेश पाटील, महेश आसबे, विजयकुमार पाटील, गोपाळ सुरवसे, आप्पा कुलकर्णी, अनिल शिंदे, सैफन शेख, सलीम शेख, विनोद शिंदे, स्वप्नील सुरवसे, उमेश कुंभार, मुकुंद जगताप, सचिन सासने, विशाल इरशेट्टी, शंकर घंदुरे आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.