
पंढरपूर (प्रतिनिधी)
मागील दहा वर्षात नागरिकांनी खासदार हे नाव ऐकले होते. परंतु खासदाराची जवळून अनुभूती घेतली नव्हती. याचाच फायदा नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना झाला आहे. नागरिकांनी त्यांच्या झोळीत भरभरून मते टाकली आहेत. परिणामी खा. प्रणिती शिंदे या लागलीच नागरिकांच्या सेवेस लागल्या आहेत.
त्यांनी केलेल्या पंढरपूर दौऱ्यात धुरळा उडवून दिला. नागरिकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामे करायची नसतील तर जिल्हा सोडून निघून जावा, अशी निर्वाणीचा इशारा दिला. परिणामी खासदारांच्या या दौऱ्यामुळे येथील नागरिक सुखावले असून, खा. शिंदे याही नागरिकांमध्ये रमल्याच्या दिसून आल्या.
सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच, खा. प्रणिती शिंदे यांनी मतदार संघात कृतज्ञता मेळावे घेतले. मेळावे पूर्ण होताच, गावभेट दौरे सुरू केले. मंगळवारी त्यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी, कासेगाव आणि गादेगावचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांमध्ये मिसळून मोठा आनंद घेतला. मागील दहा वर्षाच्या काळात, या मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आले होते. या दोन्ही खासदारांनी कधीही नागरिकांची भेट घेतली नव्हती. किंबहुना या मतदारसंघातील नागरिकांना खासदार हा दुर्मिळच होता. यामुळे नागरिकांमध्ये भाजपच्या खासदारांविषयी नाराजी होती. हीच नाराजी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे
यांना विजयी करणारी ठरली. या निवडणुकीत
प्रणिती शिंदे यांनी मला निवडून द्या, नागरिकांची आणि शेतकऱ्यांची कामे अडू देणार नाही, अशी विनंती नागरिकांना केली होती. मागील खासदारांविषयीची नाराजी आणि प्रणिती शिंदे यांनी केलेले आवाहन, यामुळे नागरिकांनी त्यांना भरभरून मते दिली होती.
याचीच परतफेड म्हणून खा. प्रणिती शिंदे यांनी,
नॉन स्टॉप गावभेट दौरे सुरू केले आहेत.
या गावभेट दौऱ्याप्रसंगी अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांच्यासोबत होते. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नावर खा. प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांची आणि नागरिकांची कामे करा, अथवा जिल्हा सोडून दूर जावा, असा इशाराच यावेळी त्यांनी दिला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे
यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयीची भूमिका सौम्य होती. परंतु मी तसे करणार नाही, शेतकरी आणि नागरिकांची कामे न झाल्यास, हक्कभंगही आणू शकते, असा सज्जड दम खा. प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खा. प्रणिती शिंदे या नागरिकांच्या जीवावर ताकदवर खासदार ठरल्या आहेत. नागरिकांकडून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा, त्यांची ताकद आणखी वाढवणार आहे.
तिसऱ्यांदा मिळालेल्या विजयामुळे त्या नक्कीच लोकप्रिय खासदार म्हणून नावलौकिक मिळवणार असल्याचे दिसून येत आहे.