
पंढरपूर (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्त मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी , महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य लाभले. या निधीतून २४ गावची उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यात यश आले. हे यश आपण दिलेल्या संधीमुळेच प्राप्त झाले असल्याचे मत महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी समाधान अवताडे यांनी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समवेत, चौथ्या दिवशी मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर, कात्राळ, कर्जळ, कागस्ट , डिकसळ, माळेवाडी, पौट, येळगी आणि हुलजंती या गावांमध्ये प्रचारदौरा करून, नागरिकांशी संवाद साधला. या दरम्यान ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून मला अतिशय कमी कालावधी मिळाला. जनतेप्रती असणाऱ्या तळमळीने मी अनेक प्रश्नांना हात घातला. विकास निधीचा हिशोब अनेक जण मागत आहेत. त्यांनी कितीही खटाटोप आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही, मी त्यांच्या टीकेला गांभीर्याने घेतलेले नाही. देशात नरेंद्र मोदी सरकार सामान्य जनतेच्या हिताचा विचार करून देश चालवत आहे. अगदी त्याच पद्धतीने राज्यात येणारे सरकारही महायुतीचेच असणार आहे. यामुळे सामान्य जनतेचे सेवाचक्र आणखी गतिमान होणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी चालू असलेली, मुख्यमंत्री लडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. यावेळी विरोधकांना त्यांनी ठणकावून सांगितले की, रस्ते, वीज ,आरोग्य, शिक्षण, पाणी इत्यादी कामांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आपण आणला असला तरीही, जनतेकडून मिळणाऱ्या आशीर्वादामुळे संधीचे सोने करून, यापेक्षाही मोठ्या विकास कामांची मंजुरी आणून मतदारसंघाला रोल मॉडेल बनवण्याचे काम पुढील काळात करणार आहोत.
महायुती सरकारने राज्याला विकास पथावर अग्रेसर ठेवले आहे. विकासाची हीच गंगा मतदारसंघात अखंडपणे राहावी, यासाठी नागरिकांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन समाधान आवताडे यांनी उपस्थित नागरीकांना केले.
याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय जमदाडे, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, संचालक तानाजी काकडे, माजी संचालक विजय माने, पप्पू काकेकर यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.